Thursday, April 23, 2020

कष्टाचे महत्त्व: राजाची शक्कल;शेतकरी मालामाल


माणूस हा आयुष्यभर कोणत्या ना काणत्या कारणांसाठी विविध प्रकारची कष्ट करत असतो. कष्ट मेहनत आणि परिश्रम या माध्यमातून यश संपादन करत असतो. कष्टाशिवाय सुख मिळू शकत नाही. सुखासाठी, आनंदासाठी, समृध्देसाठी कष्टाला पर्याय नसतो. कष्ट आणि कर्म या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, अनेकदा कर्म आणि कष्ट यांपासून माणूस दूर पळत असतो. कष्ट करण्याची तयारी नसते. असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी, अशीही अनेकांची वृत्ती असते. कष्ट करणाऱ्यांनाच कष्टांचे महत्त्व पटत असते. शिवाय दुसऱ्याला कष्ट करताना किती त्रास होतो, याचीही जाणीव असते. जीवन सुरळीत जाण्यासाठी कष्ट करणे भागच असते. कष्टांचे महत्त्व समजवण्यासाठी एका राजाने शक्कल लढवली. याचा फायदा मात्र एका गरीब शेतकऱ्याला झाला.
ललित नगरीचा राजा आदित्यदेव यांनी एक दिवस प्रजेची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सकाळी एक मोठा दगड रहदारी अधिक असलेल्या मार्गावर ठेवला. दिवस पुढे सरकला, तशी रस्त्यावर रहदारी वाढली. जो-तो त्या दगडाच्या बाजूने जायला लागला. त्या रस्त्यावर जाणाऱ्या जवळपास प्रतेकाला त्या दगडाचा त्रास होत होता. मात्र कुणीही तो दगड बाजुला करण्याचे कष्ट घेतले नाहीत. राजाचे मंत्री, सैनिक, कामगार सर्वजण त्या रस्त्यावरून गेले. परंतु कोणीही दगड रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला नाही. सूर्य डोक्यावर आल्यावर मात्र सर्वांनी राजाला आणि यंत्रणेला दोष देण्यास सुरूवात केली. राज्य कारभार करण्यास राजा सक्षम नाही. राजाला प्रशासनाचा गाडा चालवायचा अनुभव नाही. एवढेच नव्हे तर, राजाची गुप्तचर यंत्रणा झोपली आहे का? हा दगड बाजुला का केला जात नाही? असे प्रश्न उपस्थित करू लागले.

संपूर्ण दिवस राजावर दोषारोप करण्यात गेला. मात्र, कुणीही दगड हटवला नाही. सायंकाळ झाली हळूहळू अंधार होऊ लागला. त्या रस्त्यावरून एक वृध्द शेतकरी जात होता. त्याच्या डोक्यावर भाज्यांचा टोपला होता. तो शेतकरी त्या दगडाजवळ पोचला. त्यालाही अडचण आली. आपल्या डोक्यावरील ओझे उतरवून शेतकरी दगड बाजुला करू लागला. दगडामुळे ये जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये, हा उद्देश त्यामागे होता. तो दगड बाजुला करताना त्याला खुप कष्ट होत होते. शेवटी अथक प्रयत्नाने तो दगड त्याने बाजुला केला.

आपला टोपला घेऊन पुढे जाणार, इतक्यात त्या दगडाच्या जागेवर एक पिशवी दिसली. तो पिशवी जवळ गेला आणि पिशवी उचलली. त्या पिशवीत सोन्याची ५०० नाणी होती. पिशवित सोन्याची नाणी पाहून शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. तो आनंदीत झाला. त्या पिशवीत नाण्याशिवाय एक पत्र होते. त्या पत्रात लिहीले होते की, दगड बाजुला करणाऱ्याला व्यक्तिला राजा आदित्यदेव यांच्याकडून विशेष बक्षीस देण्यात येत आहे. कारण जनतेच्या अडचणी, कष्ट दूर करण्याचा आपण प्रयत्न केला.

2 comments: